वाल्मिकी डोंगर/सात रांजण

     ट्रेक वाल्मिकी डोंगर (सात रांजण  डोंगर)

      वाल्हे गाव 
     ता: पुरंदर 
     जि: पुणे 


         भाद्रपद महिना म्हणजे पित्र पंधरवड्याची  सुरुवात. भाद्रपदात महिन्यात उन्हाची त्रीवता अधिक असते.
     आज १० सप्टेंबर २०१७ आम्ही वाल्मिकी डोंगर(सात रांजण) करण्याचा बेत आखला, व त्या दिशेने खाजगी  चार चाकी वाहनाने  प्रवास सुरु केला.पुणे-हडपसर-दिवे घाट-सासवड-जेजुरी असे  मार्गक्रमण करित वाल्हे या गावी पोहचलो. 
        पुरंदर तालुक्यातील सर्वात पुरातन गाव म्हणुन ज्या गावाची ओळख आहे ते गाव म्हणजे वाल्हे गाव.
आद्य कवि रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी  यांपासुन ते अगदी शिवकालीन व त्याच बरोबर अलीकडे घडलेल्या स्वातंत्र्य संग्रामापर्यन्त इतका मोठा अवर्णनीय ऐतिहासिक वारसा या गावाला लाभला आहे.
    आद्य कवी वाल्मीकी ऋषिनी रामायण घडण्यापुर्वी रामायण लिहले,अन रामायण लिहल्यानंतर तब्बल एका तपानंतर म्हणजे १२ वर्षानंतर रामाचा जन्म झाला असे म्हणले जाते.
वाल्मीकी ऋषी हे आधी एक दरोडेखोर वाल्हया कोळी म्हणुन प्रसिद्ध होते.याच वाल्हया कोळयाने एक माणुस मारला की एक दगड रांजणात टाकत असे, अशाप्रकारे तब्बल सात रांजण भरले इतकी माणसे मारलीत.पुढें नारदमुनीच्या भेटीमुळे वाल्हया कोळयाचा वाल्मिकी ऋषी झाला अशी आख्यायिका आहे.
        वाल्हयाचा वाल्मिकी झाला म्हणुन हे गाव वाल्हे असे  ओळखले  जाते. अशी दंतकथा सुद्धा खुप प्रसिद्ध आहे.
      वाल्मिकी ऋषीची समाधी सुद्धा गावात असल्याने गावाला वाल्मीकनगरी म्हणुन सुद्धा संबोधले जाते.
      शिवकालीन इतिहास पाहिला तर शिवाजी महाराजानी आपल्या मुलीला हे गाव आंदण म्हणुन देण्यात आलं होतं असा उल्लेख सापडतो.
     छत्रपती शिवरायांच्या कन्येला फलटण वरून पुणे मुक्कामी घेऊन येत असताना वाल्हे गावा जवळ शत्रू सैनिकांनी हल्ला केला होता पण या वेळी वाल्ह्याच्या चर्मकार समाजातील लोकांनी हातात तलवारी,भाले घेऊन शत्रूवर तुटून पडली व महाराजांच्या कन्येला सुखरूप पुण्याला पोहचविले, त्या वेळी महाराज म्हणाले मी सा-या महाराष्ट्रातील महिलांचे संरक्षण करतोय आणि आज माझ्या मुलीला वाल्हेकर चर्मकार समाजातील बांधवांनी सुखरूप आणले ,मी धन्य झालो.
    त्यावेळी महाराजांनी त्यांना काय इनाम पाहिजे असे विचारले तर त्यांनी संपत्ती,जमीनी अस काही मागितलं नाही,
 त्यांनी महाराजांना अतिशय नम्र पणे महाराजांचे आडनाव मागितले,
   आजही तेच आडनाव आहे
याला ऐतिहासिक पुरावा आहे.

      वाल्हे येथे येस.टी.स्थानकाजवळ माझे चुलते तात्या महांगरे यांचे हॉटेल व घर आहे.त्यांच्या कडे  पोहे व चहा चा बेत झाला.त्यानंतर माझा चुलत भाऊ अमोल, त्याचा मित्र भुजबळ, व पवार यांना सोबत घेऊन, 


वाल्मिकी डोंगराच्या दिशेने वाटचाल सुरु केली.

सुरुवातीला सपाटी भागातून मार्गक्रमण केल्यानंतर चढण सुरु झाली.

चढण चढून मध्यावर प्रथम छोटे खाणी देवी चे मंदिर लागले.

दर्शन घेऊन पुढे  निघालो.

 थोड्याच  वेळात महादेवाचे एक मंदीर लागते.

 महादेवाचे मनोभावे दर्शन घेउन पुढे पद्भ्रमण सुरु ठेवले. 

चढण काही संपत न्हवता.पहिला डोंगर पार करुन, लगेचच दुसऱ्या डोंगरावर पोहचलो.येथून पुढे एका डोंगरावर अजुन एक महादेवाचे मंदीर लागते, परंतू या ठिकाणी जाण्याची वाट बिकट आहे.थोड्याच वेळात आम्ही मंदिरापाशी पोहचलो.

येथे महादेव चे मंदिर आहे.


 मंदिराकडे जाणारी वाट खडतर अशी आहे.

     महादेवाचे दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो येथून, 
समोरच्या उंचावर असलेल्या डोंगरावर वाल्मिकी  डोंगर नजरेस पडतो. 


त्यादिशेने आम्ही पद्भ्रमण सुरु ठेवले. वाटेत दूरवर हरणांचे  कळप दिसले, आता खरी चढाई चालू झाली. 

छातीवर येणारी  त्रिव चढण सुरु झाली,

 वाट अतिशय  घसरडी असल्याने  स्थानिक गावकरी मंडळी सुद्धा या ठिकाणी क्वचितच येतात.तसे पाहिले तर, हे ठिकाण आम्हा ट्रेकर्स  च्या दृष्टीने अपरिचित असेच होते.जेजुरी च्या पुढे  १२ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. या ठिकाणी पदभ्रमण मार्गावर आकाराने मोठ- मोठी दगडी अस्ताव्यस्त विखुरलेली होती.

 हा मार्ग  पार करणे, मोठे आव्हान आमच्यासमोर होते.

आम्ही ते लीलया पणे पार केले. वाल्मिकी डोंगरावर मोठ्या उत्साहात पाऊल ठेवले. 

जवळपास पद्भ्रमण सुरु केल्यानंतर दोन  तासांच्या अथक परिश्रमानंतर  आम्ही वाल्मिक डोंगर/सात रांजन 
येथे  पोहचलो.

 या येथील आख्यायिका अशी आहे की, या डोंगरा लगतच्या परिसरात  वाल्ह्या  कोळी लुटमार करीत असे, व लोकांना मारत असे. एक माणूस मारला कि एक दगड तो एका रांजणात टाकीत असे, असे एक-एक  करता सात  रांजणे भरले होते. नंतर नारद मुनींच्या सांगण्यावरून त्यांनी लूटमार करणे सोडले, व तपश्चर्या करीत बसले.१२  वर्षानंतर नारद मुनी परत आले, त्यावेळी ज्या ठिकाणी वाल्ह्या कोळी तपश्चर्या करायला बसले होते, त्या ठिकाणी  वारूळ निर्माण झाले होते.त्यानंतर नारद मुनींनी  त्यांना आयोध्याला नेले, व त्यांच्या कडून रामायण हा महान ग्रंथ लिहून घेतला. तेच वाल्ह्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले.

    डोंगरावरून सभोतालचा परिसर खूप सुंदर दिसतो. 

उत्तरेला वाघडर वाडी, दक्षिणेला दातेवाडी, पश्चिमेला वाल्हे, पूर्वेला अंबाची वाडी, गायकवाड वाडी हा सर्व परिसर दिसतो.वरती माथ्यावर थोडा वेळ थांबून ,
नंतर आल्या वाटेने परत वाल्हे येथे पोहचलो. 

येथून जवळच  वाल्मिकी ऋषींचे समाधी स्थळ आहे. 

तेथे जाऊन दर्शन घेतले. व नंतर वीर या गावी  वीर म्हस्कोबा चे दर्शन घेण्यासाठी नीघालो.

विर या गावी पोहचल्यावर नाथ म्हस्कोबा चे दर्शन घेतले.

दर्शन घेउन नंतर पुण्याकडे निघालो.
     आजच्या ट्रेक मध्ये जगन्नाथ पारगे,घोडे, सुनिल घम, राजेश तिखे व मी सुशील दुधाणे यांनी सहभाग घेतला.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कान्हुर पठार

महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट : कळसुबाई शिखर